देवगड हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक तालुका आहे. तालुक्यात ९८ गावे आहेत. तालुक्याचे मुख्यालय देवगड हे गाव अरबी समुद्रातील महाराष्ट्र राज्याच्या कोकण किनारपट्टीवर मुंबईच्या दक्षिणेस वसले आहे. देवगडला समुद्रकिनारा, एक छोटे बंदर आहे. समुद्र किनाऱ्यावरच्या देवगड किल्ल्यावर सन १९१५ साली बांधलेले एक दीपगृह आहे.
देवगड तालुक्यातील दुसरा किल्ला विजयदुर्ग (घेरिया) हा शिलाहार राजघराण्यातील राजा भोज द्वितीय याने बांधला, त्यानंतर आदिलशाह, शिवाजी महाराज व शेवटी कान्होजी आंग्रे यांनी त्यावर राज्य केले. ब्रिटिश राज्यकर्ते, डच, पोर्तुगीज हे या किल्ल्याला त्याच्या अभेद्यपणासाठी "पूर्वेकडचे जिब्राल्टर" म्हणत.